हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी ते धानोरा सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाबाबत गंभीर तक्रारी पुढे येत आहेत. धानोरा तसेच बोरगडी परिसरातील नागरिकांनी रस्त्याचे काम दर्जाहीन पद्धतीने होत असल्याचा आरोप केला असून काम तात्काळ तपासून योग्य दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
धानोरा येथील नागरिक विजय शिंदे, सिद्धोधन हनवते, रामगिरी, नारायण देवकाते, जयस्वाल, साखरे, मुकींद हाके यांच्यासह अनेक नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. तरीदेखील कामात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन आणि उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी सांगितले की, रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्य वापरण्यात येत असून, यामुळे भविष्यात अपघातांचा धोका वाढण्याबरोबरच शासनाच्या कोट्यवधींच्या निधीचा अपव्यय होत, असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या तक्रारीनंतर संबंधित विभाग व ठेकेदाराने याकडे गांभीर्याने लक्ष देत पारदर्शक चौकशी करून दर्जेदार काम करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. आता प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


